अनधिकृत होर्डींगमुळे दिवा शहराचे विद्रुपीकरण; ठाणे महापालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह?


दिवा : प्रतिनिधी (निलेश घाग)

ठाणे महानगरपालिकेच्या दिवा प्रभाग समितीत सध्या ठिकठिकाणी अनधिकृत होर्डींगचे पेव फुटले असून यात विविध राजकीय संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांच्या होर्डींगचे प्रमाण जास्त आहे.अनेक ठिकाणी पोस्टर्स व होर्डींगचा भडिमार झाला आहे.त्यामुळे शहराचे विद्रुपिकरण झाले असून,याबाबत ठाणे महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

दिवा शहरात दिवा स्टेशन,मुंब्रादेवी काँलनी,दिवा चौक,साबे गाव,दातिवली चौक,गणेशनगर,बेडेकरनगर,बीआर नगर तसेच दिवा दातिवली मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा अनधिकृत होर्डींग बोर्डांचे पेव फुटले आहे.यात वाढदिवसानिमीत्त किंवा निवड नियुक्तीनिमीत्त शुभेच्छा देणाऱ्या होर्डींगचे प्रमाण जास्त आहे.वाढदिवस होऊन गेल्यानंतरही कित्येक दिवस हे होर्डींग तसेच ठेवण्यात येतात.शहरातील फेरीवाल्यांवर कारवाई केली जाते.मात्र बड्या नेत्यांच्या शुभेच्छा देणाऱ्या होर्डींगवर कारवाई केली जात नाही,अशी ओरड नागरिकांतून होत आहे.

विविध सण उत्सवानिमीत्त आतापर्यंत शहरातील जवळपास प्रत्येक चौकात विविध पक्षांचे, व सार्वजनिक मंडळांचे स्वागतपर कमानी,होर्डींग व स्वागतफलक लावले जात आहेत.अनेक ठिकाणी कार्यक्रम उरकला तरीदेखील स्वागत कमानी व स्वागतफलक तसेच ठेवण्यात आले आहेत.महापालिकेच्या सबंधित विभागामार्फत या होर्डींगकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.त्यामुळे शहराच्या मुख्य रस्त्यांपासून ते कानाकोपऱ्यातही बेकायदेशीर होर्डींग आणि आणि बॅनर लागल्याचे दिसत आहे.राजकीय वर्चस्व असलेल्या भागात रस्त्यांवरील फुटपाथांवर अतिक्रमणासह अनधिकृत होर्डींगचे पेव फुटले आहे.

शहराला स्मार्ट सिटी बनविण्याचे स्वप्न एकीकडे पाहीले जात असतानाच दुसरीकडे मात्र राजकीय पक्षांकडूनच शहर विद्रुपीकरण करण्यात येत आहे.चौकाचौकांत वाढदिवसांचे शुभेच्छा देणारे बॅनर्ससह होर्डींग व पोस्टर लावण्यात येत असल्याने शहराच्या विद्रुपीकरणात भर पडत आहे.स्थानिक मंडळे आणि संस्थांकडूनही भरमसाठ होर्डींग आणि बॅनरबाजी सुरु आहे.या बॅनर्सची उंचीही खूप मोठी असून राजकीय बलाबल सिद्ध करण्याचा प्रयत्नही यातून होताना दिसत आहे.

विनापरवाना होर्डींग  आणि बॅनरवर कारवाई करण्याबाबत महापालिका प्रशासनाकडून हलगर्जीपणा केला जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.बेकायदा होर्डींगमुळे यापुर्वी दुर्घटना घडल्या होत्या.त्यामुळे एखाद्या अप्रिय घटनेनंतरच बेकायदा होर्डींगवर कारवाई करणार का असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत.

टिप्पण्या