दिव्यात तात्पुरते २५-३० खाटांचे रुग्णालय उभारा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठामपा आयुक्तांना पत्र
४ लाखांच्यावर लोकसंख्या असलेल्या दिव्यातील
जनतेच्या सुरक्षेसाठी ईमेलद्वारे केला पत्रव्यवहार
ठाणे (प्रतिनिधी) जगात कोरोना विषाणुने हाहाकार माजवला आहे.त्यामुळे नेहमीच आरोग्याच्या सरकारी सुविधेपासून वंचित राहीलेला ठाणे शहरातील दिवा विभाग चर्चेत आहे.या शहराची लोकसंख्या ४ लाखांच्यावर जावून पोचली तरी प्राथमिक सुविधेसाठी आरोग्य केंद्राची सुविधा नाही,त्यामुळे येथे राहणाऱ्या मजूर,गोरगरीब व गरजवंतांनी कल्याण-डोंबिवली जावून खर्चिक तपासणी करायची का असा प्रश्न दिव्यातील नागरिकांना पडला आहे.म्हणून किमान या महामारीच्या काळात दिव्यात तात्पुरते २५-३० खाटांचे तरी रुग्णालये उभारा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिवा उपविभागिय अध्यक्ष श्री प्रशांत गावडे यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त श्री विजय सिंगल यांच्याकडे ई-मेलद्वारे पत्रव्यवहार केला आहे.
ठाणे महानगर पालिकेच्या अधिकार कक्षात दिवा हा विभाग देखील येतो. दिव्यातील प्रभाग क्रमांक २७ आणि २८ हे ठाणे महानगरपालिकेच्या अखत्यारीत येतात. काही वर्षांपूर्वी इथे दिवा प्रभाग समितीही अस्तित्वात आली.आज घडीला दिव्यातील लोकसंख्या ही अंदाजे ४ लाखांच्या वर जाऊन पोहचली आहे. मात्र त्याप्रमाणात दिव्यात लागणाऱ्या प्राथमिक सुविधा या मात्र इथे उपलब्ध नाहीत.
सध्या राज्य सरकार,केंद्र सरकार आणि सामान्य जनता सगळेच या कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी तयारी करीत आहे. परंतु दिव्यात मात्र परिस्थिती खूप वेगळी आहे. आजच्या घडीला दिव्यातील डॉक्टर काम बंद करून सुट्टीवर आहेत, अजून कित्येक डॉक्टरांनी आपले दवाखाने उघडले नाही आहेत. त्यामुळे किरकोळ ताप, सर्दी, खोकला याच्यावर नागरिकांना ईलाज घेता येणे कठीण होऊन बसले आहे. आज दिव्याच्या आजूबाजूच्या ठाणे, कळवा, मुंब्रा, डोंबिवली, कल्याण इथे कोरोनाचे संशयित रुग्ण आढळले आहेत, त्यांच्यावर तिथल्या पालिका रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
सध्या चार लाख लोकसंख्येच्या दिव्यात मात्र एकही पालिकेचे रुग्णालय नाही. देव न करो पण जर का उद्या दिव्यात एखादी कोरोनाची केस सापडली तर संपूर्ण दिव्यात हाहाकार उडेल.अशा परिस्थितीत ठाणे किंवा डोंबिवली इथल्या पालिका रुग्णालयात जाण्यावाचून दिवेकरांना जावे लागण्याची शक्यता आहे.यातूनही अधिकच या आजाराचा संसर्ग वाढू शकतो. राज्य सरकारच्या माहितीप्रमाणे आता महाराष्ट्र कोरोनाच्या तिसऱ्या स्टेजच्या दिशेने प्रवास करतोय,त्यामुळे ही वेळ येण्यापूर्वीच दिव्यात प्रतिबंधात्मक पाऊल उचलणे गरजेचे आहे. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने ईमलद्वारे पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
दिव्यात तात्पुरत्या स्वरूपात किमान २५ ते ३० खाटांच्या क्षमतेच्या रुग्णालयाची उभारणी करण्यात यावी, ज्यात व्हेंटिलेटर आणि OPD ची सुविधाही नागरिकांना उपलब्ध करून द्यावी ज्यामुळे दिवेकर नागरिकांना याचा फायदा घेता येईल. आपल्या अधिकाऱ्यांमार्फत दिव्याच्या परिस्थिती बद्दल माहिती घ्यावी आणि Prevention is better than Cure या इंग्रजी म्हणीप्रमाणे आपण दिवेकरांच्या आरोग्यासाठी या पत्राची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने मागणी करण्यात आली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा